२२ वा वर्धापन दिन

संस्मरणीयवर्धापनदिन

मानव्याचा २२वा वर्धापनदिन ३० जून२०१९ रोजी एस एम जोशी सभागृह पुणे येथे संपन्न झाला.देणगीदार,हितचिंतक व कार्यकर्ते यांना जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमासाठी येता यावे

या हेतूने यावेळी कार्यक्रम स्थळात बदल करण्यात आला आणि त्याचा चांगला परिणाम दिसून आला.काही नवीन माणसे जोडली गेली.यावेळी निवेदन लिहिण्यापासून आभार मानण्यापर्यंतची सर्व जबाबदारी 

संस्थेच्या मुलामुलींनी स्व्यप्रेरणेने पार पाडली.यानिमित्ताने विचारांचे महत्त्व, वक्तशीरपणा, शिस्तबद्धता,सुसुत्रता,आत्मविश्वास अशा अनेक गोष्टींचे महत्व मुलांना समजले.

आपल्यातील सर्व गुणांचा कस लागून नवनिर्मितीचा आणि त्याच्या सादरीकरणाचा आनंद मुलांनी अनुभवला.संस्थेच्या सर्वकर्मचाऱ्यांना, ट्रस्टीना सुद्धा याचे समाधान आणि कौतुक वाटले.

कार्यक्रमामध्ये दोन मुलांच्या यशोगाथा सांगण्यात आल्या. विकास शिंदे या ८ वर्षिय मुलांचे आजारपण इतके गुतागुंतीचे होते. पण साईनाथ या आपल्याच संस्थेच्या मुलाने प्रेमाने, आपुलकीने आणि सेवाभावाने त्याची सातत्याने काळजी घेऊन त्याला पूर्ण बरे केलेआणि शिक्षणाच्या प्रवाहात आणले या गोष्टीचे डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटत आहे.

प्रेम व स्नेहभावाने सेवा केल्यास आश्चर्य कारकरित्या जीवन पुन्हा उभे राहू शकते हे साईनाथने दाखवूनदिले. या वेळी त्याचा सत्कार करण्यात आला. दुसरी केस सुषमा हीची होती. सुषमाने स्वत:चीच कहाणी स्वत:च्या शब्दात सादर केली. तिच्या निराधार आयुष्याला मिळालेला मानव्यचा हात आणि नंतर तिच्या वयाच्या ४ वर्षापासून ते आत्ता १८ व्या वर्षापर्यंतचा प्रवास तिने वर्णन केला व पुढील भविष्याची रूपरेखा मांडली  मानव्यने वेळेत दिलेला आधार, प्रेम व त्या ही पुढे जाऊन जीवनाला अर्थपूर्ण करण्यासाठी लागणारी व्हिजन/दृष्टीदिल्याबद्दल सुषमाने संस्थेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.

यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.डॉ. राजीव बसर्गेकर यांनी आपल्या भाषणातून व्यक्तिमत्त्व विकासासाठी पाच कार्मेदिय, पाच ज्ञानेंद्रीये यांच्या मदतीने निसर्गाकडून काय शिकता येते याबद्दल सुंदर मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष मा.श्रीशिरिष लवाटे यांनी आपल्या भाषणातून मानव्यचा प्रवास व भवितव्य यावर आपले विचार मांडले एच आय व्ही बद्दल समाजाचा दृष्टीकोन बदलला पाहिजे आणि एच आय व्ही मुलांना देखील समाजाच्या मुख्य प्रवाहात  आणणे गरजेचे आहे हे सांगितले.

कला-गुणदर्शन कार्यक्रमात मुला-मुलींचे नृत्यांचे सादरीकरण झाले यात लोककला, वेस्टर्नडान्स,नृत्य-नाटिका यांची छान गुंफण पहावयास मिळाली.

सर्व सादरीकरणात उपस्थितांनी टाळ्यांवर ताल धरून सहर्ष आपला सहभाग नोंदवला. सादरीकरणात शेवटी मानव्याच्या संस्थापिका कै. विजयाताई लवाटे यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करताना, आईच्या ममतेने वाढलेल्यामानव्यचा प्रातिनिधिक अविष्कार म्हणून छोट्या साक्षीने आणि प्रज्ञाने एक       नृत्य-नाटिका सादर केली. या वेळी साऱ्या सभागृहाचे डोळे पाणावले गेले.

कार्यक्रमाच्या शेवटी मानव्यच्या सर्व कर्मचाऱ्यांना मुलांचे कुटुंब सदस्य या नात्याने मुलांनी छान सरप्राईज दिले. मुलांनी या वेळी प्रत्येक कर्मचाऱ्याबद्दल त्यांना वाटलेल्या भावना स्व-रचित काव्यरूपाने व्यक्त केल्या. कार्यक्रमाचा हा कळस होता.

शेवटी मानव्यची सर्व मुले-मुली , कर्मचारी, अध्यक्ष, विश्वस्त यांनी एकत्रितपणे उपस्थित सर्व हितचिंतक, देणगीदार, मदतकर्ते यांना विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.

स्टॉलवर ठेवलेल्या मुला-मुलींनी बनवलेल्या विविध वस्तूंना पण चांगला प्रतिसाद मिळाला.

स्नेहभोजनाच्यावेळी अध्यक्ष, इतर विश्वस्त, कर्मचारी यांनी उपस्थिताशी अनौपचारीक संवाद साधला.